तीन वर्षापूर्वी महाराष्ट्रात तूरडाळीचे विक्रमी उत्पादन झाले होते. त्यावेळी डाळीच्या उत्पादनाबद्दल महाराष्ट्रला पुरस्कारही मिळाला होता.
मुंबई - तीन वर्षापूर्वी महाराष्ट्रात तूरडाळीचे विक्रमी उत्पादन झाले होते. त्यावेळी डाळीच्या उत्पादनाबद्दल महाराष्ट्रला पुरस्कारही मिळाला होता.
या वर्षी डाळीचे वाढलेले भाव चिंताजनक आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खडे बोल सुनावले. इतकेच नव्हे तर तुरीचे उत्पादन करण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात याबाबत मुख्यमंत्र्यांची शाळाही पवार यांनी यावेळी घेतली. फडणवीस यांनी हा ‘पाहुणचार’ स्वीकारल्यावर, पवार यांचा सल्ला मोलाचा असल्याचे सांगत वेळ मारून नेली.
बारामती येथे ११० एकरामध्ये भरलेल्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी शरद पवार, कृषिमंत्री एकनाथ खडसे, अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर होते. पवार यांनी डाळीच्या महागाईवर अचूक बोट ठेवले. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या माहितीसाठी मी सांगतो की, तीन वर्षापूर्वी डाळीचे विक्रमी उत्पादन झाले होते.
त्याबद्दल राज्याला पहिले पारितोषिक मिळाले होते. सणासुदीला घरा-घरामध्ये डाळीचीच चर्चा होत आहे. असा गंभीर प्रश्न निर्माण व्हायचा नसेल तर शेतक-यांना योग्य बियाण्यांचे वाण उपलब्ध करून दिले पाहिजे. त्यानंतर फडणवीस यांनी दीर्घकालीन नियोजन आवश्यक असल्याचे सांगत बाजू सावरली.
शिवसेनेच्या पोटात गोळा
महाराष्ट्राच्या सत्तेत नाममात्र वाटा असलेल्या शिवसेनेला काबूत ठेवण्यासाठी बारामतीचे औषध भाजपाने जवळ बाळगले आहे की काय, अशी चर्चा होत आहे. अलीकडेच झालेल्या कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाच्या नेत्यांनी एकमेकांवर मर्यादा सोडून टीका केली. दोघांमधील संबंध ताणले गेलेले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांचे गोडवे गायले. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनीही बारामतीला भेटी देऊन तेथील विकास प्रकल्पाचे कौतुक केले होते. शिवसेनेने फारच ताणून धरले तर राष्ट्रवादीच्या सहकार्याने सरकार तारता येऊ शकते, असा संदेश शिवसेनेला देण्याचाच या गाठी-भेटीमध्ये उद्देश असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
 
Top